एक नजर महाराष्ट्र मुबंई: आज, मकर संक्रांतीच्या दिवशी राज्यातील तापमान स्थिर राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसचं कोकण किनार पट्टीवर आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) नागरिक यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत थंड दिवसाने गारठले असून मंगळवारी दिल्लीत शिमल्यापेक्षाही एका अंशाने कमी म्हणजे तीन अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. २४ तास वाहणाऱ्या अतिथंडगार वाऱ्यांमुळे नागरिकांचे आणखी हाल झाले. दिवसाही स्वेटर, कोट, माकडटोपी परिधान करणे भाग पडले. गुरुग्राममधे तर सोमवारी पारा ०.६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. दिल्लीतील तापमानही येत्या एक-दोन दिवसात त्याच पावलावर पाऊल ठेवेल असाही अंदाज आहे.भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, दिल्लीत गुरुवारपर्यंत (१५ जानेवारी) सध्याची थंडीची लाट व दाट धुकेही कायम राहणार आहे. त्यानंतर किमान तापमानात २-४ अंशांची थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे. आयएमडीने संपूर्ण एनसीआरमध्ये थंडीची लाट आणि दाट धुक्याचा ऑरेंज इशारा जारी केला आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत थंडीचा कहर वाढविणाऱ्या अवकाळी पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.






